कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथे किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले. किसान सभेने काढलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून कळवणमध्ये आदिवासी बांधवांनी सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित झाले आहे. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
यावेळी प्रकल्प अधिकारी विशाल नरावडे सात तालुक्यांतील गटविकास अधिकारी सर्व ग्रामसेवक, सरपंच डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावित, माजी आमदार जे. पी. गावित, हिरामण गावित, सुभाष चौधरी, नितीन गावित, अशोक धूम, नीलेश शिंदे यांच्या बैठकीत तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व कांद्यावर निर्यातबंदी उठवावी व कांद्याला हमी द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेने माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली कळवणपासून 5 किलोमीटर पायी मोर्चा काढून प्रशासकीय कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक महिन्यात शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी केली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी कळवण व सुरगाणा मतदारसंघात फक्त विकासाचे बॅनर लागले असून, मतदारसंघातील रस्ते सर्व खड्डेमय झाले आहे. मतदारसंघाचा विकास खुंटला आहे, असा आरोप प्रदीप पगार यांनी केला. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष केदा सोनवणे, संतोष देशमुख, क्रांतिवीर छावा सेना तालुकाप्रमुख प्रदीप पगार, पाळे उपसरपंच बंटी पाटील, नितीन गावित, अशोक धूम, राम चौरे, जितेंद्र पगार, किसान सभा तालुका अध्यक्ष नीलेश शिंदे, विवेक महाजन आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- पुणे विभागातील 11 रेल्वे फाटके झाली कायमची बंद !
- नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड-शो होणार, पालकमंत्र्यांकडून मार्गाची पाहणी
- Maharashtra Politics : मुंबई ते मुंबई व्हाया सुरत, गुवाहाटी, गोवा
The post लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले appeared first on पुढारी.