सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सरकार आहे. या सरकारमध्ये आता तिसरा भिडू आल्यामुळे साहजीकच खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारास विलंब होत असल्याची कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मत मांडले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो होतो. परंतु नाशिक जिल्ह्यात घडलेल्या बसच्या अपघातामुळे मला नाईलाजाने तातडीने नाशिक इथे यावं लागलं. त्यानंतर मी नाशिक येथून घरी आलो. मंत्रीमंडळाचा विस्तार गुरुवारी होता. आता शुक्रवारी दुपारपर्यंत होणार असल्याचे ऐकतोय, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

अर्थ खात्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्याच निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. याबाबत काही नाराजीच्या वावड्या उठवल्या जाताहेत. काही मंत्र्यांच्या शपथविधी घेणे आहे. तिसरा भिडू आल्यामुळे साहजिक आहे. खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे खातेवाटपाला विलंब होत आहे. खातेवाटपाबाबत एकमेकांमध्ये नाराजी आहे, असा याचा अर्थ नाही. अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. नाराजीच्या चर्चांना काही अर्थ नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.