29 प्रवासी बचावले, ‘शिवशाही’ बसला लागलेल्या आगीची चाैकशी सुरु 

शिवशाई बस आगीची चौकशी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला रविवारी (दि. १०) चितेगाव फाटा येथे लागलेल्या आगीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने समितीमार्फत अपघाताची चाैकशी सुरू केली आहे. समिती अहवालानंतर आगाचे कारण स्पष्ट होईल.

चितेगाव फाट्याजवळ शिवशाहीला बसला आग लागल्याची घटना घडली. इंजिनाजवळ धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातावेळी बसमध्ये २९ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांनी नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवास सुरू केला होता. मात्र, अपघातानंतर शिवशाहीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले. एसटी महामंडळाने या अपघाताची दखल घेत चाैकशी समिती नेमली आहे. समितीकडून आगीत खाक झालेल्या बसची तपासणी केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. समितीच्या अहवालानंतरच आगीच्या घटनेचे स्पष्ट कारण समोर येईल.

बसेसची होणार तपासणी

महामंडळाच्या नाशिक विभागाकडे ७४ शिवशाही बसेस आहेत. तसेच दररोज परजिल्ह्यातून ५६ शिवशाही बसेस नाशिकमध्ये येतात. यापूर्वी घडलेल्या बहुतांश अपघातांतील शिवशाही बसेस या परजिल्ह्यातील असून, नाशिक विभागाच्या ताफ्यातील बसेसपैकी केवळ एका बसच्या टायरला महामार्ग बसस्थानकात आग लागल्याची घटना घडल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. तसेच स्थानकामधून दरदिवशी बसेस बाहेर पडण्यापूर्वी; दर दहा दिवसांनी तसेच दर दोन महिन्यांनी नियमित तपासणी करण्यात येते. या तपासणीवेळी बसगाडीतील छोटे-मोठा दोष दूर करणे सोपे होते, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post 29 प्रवासी बचावले, 'शिवशाही' बसला लागलेल्या आगीची चाैकशी सुरु  appeared first on पुढारी.