Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होत असेल, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. नाशिक जिल्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा अशा पद्धतीने काँग्रेस आणि राहुल गांधींकडून वारंवार अवमान होत असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचा अभिमान, स्वाभिमान, शान आणि मान आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी पंचवटीतील भारत गौरव यात्रेच्या समारोपाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतात की, महापुरुषांचा अपमान करणे ही आपली भारतीय संस्कृती नाही, तरीदेखील काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रातील आडगाव नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा अशी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. यात्रेचा समारोप पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादनाने करण्यात आला.

हेही वाचा : 

The post Nashik : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही appeared first on पुढारी.