World Environment Day : नाशिकमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्राची स्थापना

World Environment Day

नाशिक : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा या मोहिमांच्या अंतर्गत मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये आरआरआर केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. (World Environment Day)

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथेही नुकतीच आरआरआर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते, की आपल्याकडील निरुपयोगी वस्तू उदा. कपडे, पादत्राणे, भांडी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, स्टेशनरी आदी प्रकारच्या वस्तू मनपाच्या आरआरआर केंद्रांत जमा कराव्यात. जेणेकरून कचऱ्याची निर्मिती कमी होईल, कचऱ्याचा पुनर्वापर होईल किंवा कचऱ्यापासून नवीन वस्तू तयार केल्या जातील. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली आहे. (World Environment Day)

विनावापरातील कपडे, पादत्राणे, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू वा शोभेच्या वस्तू अशा अनेक वस्तू नागरिकांकडून कच-यात टाकून दिल्या जातात. यामुळे शहरातील कच-यात वाढ होण्याबरोबरच विद्रुपीकरणात देखील भर पडते. मात्र या नको असलेल्या गोष्टी पालिका  ‘आरआरआर केंद्रा’च्या माध्यमातून नागरिकांकडून संकलित करणार आहे. संकलित झालेल्या वस्तू गरजवंत नागरिक, एनजीओ ना देण्यात येणार आहे.

गरजवंताना मदत….

नागरिकांकडून विनावापरातील वस्तू या कच-यात टाकून दिल्या जातात. मात्र, या उपक्रमाअंतर्गत पुर्नवापरयोग्य असलेल्या वस्तू देखील गरजवंत नागरिक, एनजीओ ना देण्यात येणार असल्याने त्यांना देखील मदत होणार आहे. त्यातून वस्तू कच-यात न जाता ती कुणाच्या तरी उपयोगासाठी येणार आहे.

शहर स्वच्छतेला हातभार …..

या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्मिती कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच निर्माण झालेला कचऱ्यांचा पुनर्वापर करणे शक्य होणार असल्याने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

The post World Environment Day : नाशिकमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्राची स्थापना appeared first on पुढारी.