देवळा: पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला ठाेकले टाळे

देवळा (जि. नाशिक) : चणकापूर उजव्या कालव्याच्या आवर्तनाने रामेश्वर धरण ३० टक्के भरले आहे. मात्र तरीही गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गुंजाळनगर गावासाठी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने येथील महिलांनी गुरुवार (दि.२३) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत येथील ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे.

गुंजाळनगर गावाला रामेश्वर धरणावरून पाणीपुरवठा होतो. परंतु गेल्या तीन महिन्यापासून रामेश्वर धरण कोरडेठाक पडले असल्याने येथील पाणीपुरवठा ठप्प आहे. धरणातच पाणी नसल्याने येथील पाणीपुरवठा योजना बंद आहे. ग्रामस्थांना गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

गुंजाळनगर गावाला पिण्यासाठी दिवसाला दोन टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने पंधरा ते वीस दिवसांत अत्यल्प पाणी पुरवठा होत असतो मात्र तो पुरेसा नसतो. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याचा हा यक्षप्रश्न निर्माण झाल्यामुळे येथील संतप्त महिलांनी गुरुवार (दि..२३) रोजी गुंजाळनगर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीला जोपर्यंत पिण्याचे पाणी येत नाही तोपर्यंत टाळे ठोकले.

येथील अवलंबून राहण्याऱ्या पाणीपुरवठा योजना या रामेश्वर धरणावरून होत असून धरणात ३० एप्रिल २०२४ रोजी चणकापूर उजव्या कालव्यातून रामेश्वरसाठी पिण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र हे आवर्तन २० मे रोजी बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत रामेश्वर धरणात ३० टक्के पाणीसाठा असूनही गावासाठी पाणी पुरवठा होत नसल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला. जोपर्यंत पिण्याचे पाणी येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामपंचायतीला टाळे टोकले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावणे चुकीचे आहे .चनकापूर उजव्या कालव्या द्वारे रामेश्वर धरणात पाणी आल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी आले असून ,उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. – विनोद आहेर, उपसरपंच ,गुंजाळनगर ग्रामपंचायत.

हेही वाचा: