नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

नंदुरबार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बालताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, अनेक गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे सरकारी योजनांची योग्य अशी माहिती नाही. योजनांचा लाभ घेण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती करण्यास ते सक्षम नाहीत. विकसित भारत संकल्प यात्रेत प्रत्येक गावात जाऊन खऱ्या  लाभार्थ्यांना भेटून  यशस्वी करण्याच्या संकल्पामुळे मोफत अन्नधान्य मिळवून देणारी शिधापत्रिका प्रत्येक गरीबाजवळ असेल,प्रत्येक गरिबाकडे उज्वला गॅस जोडणी असेल, सौभाग्य योजनेद्वारे वीज पुरवठा सुरू राहील आणि नळातून पिण्याचे पाणी मिळेल. प्रत्येक गरीबाजवळ पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय इलाज उपलब्ध करून देणारे आयुष्मान भारत कार्ड असेल. प्रत्येक गरिबा जवळ त्याचे स्वतःचे पक्के घर असेल. प्रत्येक शेतकरी सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेबरोबर जोडला जाईल. प्रत्येक कामगार निवृत्ती वेतन योजनेचा लाभार्थी बनेल, प्रत्येक पात्र युवक मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि एक नवउद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. विकसित भारत संकल्प यात्रा एका प्रकारे देशातील गरिबांना, माता भगिनींना, युवकांना, शेतकऱ्यांना हमखास विकासाचा खात्रीशीर पर्याय आहे.

ते पुढे म्हणाले, देशातल्या शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता देण्यात आला त्यात कोणाचीही मध्यस्थता नाही. सरकारचे शेतकऱ्यांशी थेट नाते जुळले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बिसाणे, पीकपद्धती याबात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. भरड धान्याला नवी ओळख देत आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात आहे. याचाही लाभ आमच्या आदिवासी बंधू भगिनींना होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळोदा तालुक्यातील करडे,सिंगसपूर या ग्रामपंचायतींच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.

The post नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा appeared first on पुढारी.