नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी

भुतारसेत ग्रामस्थ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कामे सुरू आहेत. यामध्ये भुतारसेत येथे विहिरीला पाणी लागल्यानंतर काम न मिळाल्याच्या रागातून ठेकेदाराने काम बंद पाडले. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट सीईओंचे कार्यालय गाठत काम कोणाकडूनही करा; आम्हाला फक्त पाणी द्या, अशी आर्त विनवणी केली. याबाबत सीईओंनी लक्ष घालत विहिरीचे काम सुरू करण्याचे तसेच काम बंद पाडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेंतर्गत २ कोटी १० लाख रुपये खर्चून चार विहिरींची कामे सुरू आहेत. यापैकी भुतारसेत येथे एका ठेकेदाराने विहिरीचे काम सुरू केले होते. साधारणपणे १५ फूट विहीर खोदल्यानंतर विहिरीला पाणी लागले आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र, हा आनंद थोडाच काळ टिकला. काम आपल्याला मिळाले नाही हा राग मनात ठेवत एका ठेकेदाराने हे काम बंद पाडले. संतप्त ग्रामस्थांनी सीईओ मित्तल यांचे कार्यालय गाठले आणि तक्रार करत काम सुरू करण्याची मागणी केली.

यात आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, विष्णू दोबाडे, जयराम भुसारे, मच्छिंद्रनाथ भोये, मनोज वाजे, चंदर महाले, कृष्णा खोटरे, सखाराम चौधरी, शांताराम गवळी, शीतल चौधरी, आनंदी भोये यांचा समावेश होता.

हेही वाचा :

The post नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी appeared first on पुढारी.