बायका माहेरी गेल्या, इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न

लग्न

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्य्या बहिणींचा विवाह झाला होता. मात्र,  विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी त्यांचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या. मात्र, त्यानंतर या दोन्ही भावांनी दुसरा विवाह केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चौघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे.

देशशिरवाडे येथील दोन्ही बहिणींचा विवाह धुळे तालुक्यातील आर्वी येथील सुनील व अनिल सोनवणे या सख्या भावांशी सन 2016 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दोघी बहिणींचा छळ सुरू झाला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे दोन्ही बहिणी मुलांना घेऊन साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे माहेरी आल्या. कोरोना काळात त्यांचा सोनवणे कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दोघी बहिणींना गाफील ठेवून सुनील व अनिल सोनवणे यांनी दुसरे लग्न करुन घेतले अशी तक्रार पीडित बहिणींनी दिली आहे. त्यावरुन सुनील संतोष सोनवणे, अनिल संतोष सोनवणे, संतोष जंगलू सोनवणे, कौशल्याबाई संतोष सोनवणे यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही तक्रारींचा सखोल तपास करणार

पीडित दोन्ही बहिणी कोरोना काळात माहेरी होत्या. महिला तक्रार निवारण कक्षात त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. दोघींच्या पतीने दुसरा विवाह केला असल्याचे त्या सांगत आहे. या प्रकरणी तपास होईल.- सपोनि श्रीकृष्ण पारधी,पिंपळनेर पोलिस ठाणे

हेही वाचा :

The post बायका माहेरी गेल्या, इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न appeared first on पुढारी.