भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा

विषबाधा www.pudhari.news

नंदुरबार – तालुक्यातील रनाळे येथे बाळूमामाच्या भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर 200 भाविकांना विषबाधा झाली. यातील 34 जणांना अधिक लक्षण आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत प्राप्त अधिक माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे काल दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजता बाळूमामाचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी भगर आमटी आणि दूध याचा प्रसाद वाटप करण्यात आला. धार्मिक कार्यक्रम आटोपून हा प्रसाद खाल्ल्यानंतर गावातील लोक आपापल्या घरी निघून गेले. परंतु अचानक रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान प्रसाद ग्रहण करणाऱ्यांपैकी गावातील एका मागून एक भाविक रुग्णालयात दाखल होऊ लागल्यामुळे एकच धावपळ उडाली. वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार जवळपास 194 जण पहाटेपर्यंत दाखल झाले होते तथापि प्राथमिक उपचारानंतर यातील बहुतांश जणांना सकाळी घरी रवाना करण्यात आले. मळमळ चक्कर उलटी अशी लक्षणे आढळून आलेल्या 34 जणांना मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्टाफने तातडीने त्यांच्यावर उपचार केले त्यामुळे आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे यांनी दिली. अधिष्ठाता डॉक्टर हुमणे तसेच जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी स्वतः भेट देऊन रुग्णांची तपासणी केली तसेच उपचाराची सोय केली.

हेही वाचा :

The post भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.