राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला हा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत ठरणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे-पाटील यांनी महायुतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. राज्यात महायुतीतील जागांबाबत त्यांनी प्रथमच भाष्य करत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पवार गट यांना जागावाटपाबाबत अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. काँग्रेसवर त्यांनी टीका केली. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करताना, वाटाघाटी करायला फक्त नेते येतात. त्यात वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमधील अनेकांची इकडे येण्याची इच्छा असल्याचा दावाही विखे-पाटील यांनी केला. इंडिया आघाडीत बिघाडी असून, राज्य व देशात गेलेली सत्ता कशी मिळवायची एवढीच त्यांना चिंता असल्याचा टोमणा विखे-पाटील यांनी लगावला.

केंद्र सरकारच्या नवीन हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. यादरम्यान नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री विखे-पाटील यांचे संपाकडे लक्ष वेधण्यात आले. ते म्हणाले, हिट ॲण्ड रन कायद्याविषयी थोडा समज-गैरसमज आहे. अनेक ठिकाणी संप मागे घेतले आहेत. स्थिती तशीच राहिल्यास गंभीर आहे. पेट्रोलपंपांसमोर रांगा लागल्या असून, येणाऱ्या बातम्यांमुळे लोक तणावात असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. पानेवाडी (मनमाड) प्रकल्पामधून पोलिस बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढा, असे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मंत्री विखे-पाटील यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा हे तातडीने पानेवाडीकडे रवाना झाले.

संपाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या पानेवाडीतून पाेलिस बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा कुणीही हातात घेणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही विखे-पाटील यांनी केल्या आहेत. संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत केंद्र सरकारला माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या उपस्थितीत निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला हा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत ठरणार असल्याचे विखे-पाटील म्हणाले. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करताना, वाटाघाटी करायला फक्त नेते येतात. त्यात वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमधील अनेकांची इकडे येण्याची इच्छा असल्याचा दावाही विखे-पाटील यांनी केला. इंडिया आघाडीत बिघाडी असून, राज्य व देशात गेलेली सत्ता कशी मिळवायची एवढीच त्यांना चिंता असल्याचा टोमणा विखे-पाटील यांनी लगावला.

चर्चेतून मार्ग निघतो

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता विखे-पाटील म्हणाले, आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. अनेक राज्यांमध्ये यापूर्वी आंदोलने झाली आहेत. जरांगे यांनी चर्चेला यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, चर्चेतून मार्ग निघतो, अशी प्रतिक्रिया विखे-पाटील यांनी दिली.

The post राज्यात महायुतीचा फॉर्म्युला मोदींच्या उपस्थितीत ठरणार appeared first on पुढारी.