संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व…

संस्कृत दिन विशेष.www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

संस्कृत बीजमंत्राचा मानवी जीवनावर इतका सखोल परिणाम होतो की, संस्कृत भाषेच्या उच्चाराने माणसाच्या वाणीतले कोणतेही दोष दूर करण्याची ताकद संस्कृत भाषेत आहे. लहानपणापासून जर मुलांवर स्तोत्र, श्लोक म्हणण्याचे संस्कार असतील, तर मूल कधीही तोतरे बोलत नाही. त्याच्या उच्चारांमध्ये स्पष्टता येऊन अवघड शब्दही ते सहज उच्चारू शकतात तसेच बौद्धिक क्षमतेत वाढ होते, असे संस्कृत क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगतात.

संस्कृत भाषेचे महत्त्व हे केवळ पूजा, पुराणांसाठी नसून संस्कृत ही विज्ञान, कला, वाङ्मय, साहित्याची भाषा आहे. संस्कृतशी कायमस्वरूपी संबंध असल्यास त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. यामुळे मानसिक आजारांना तोंड द्यावे लागत नाही, ह्दयाची क्षमता वाढते. संस्कृत मंत्राच्या उच्चाराने आपोआप प्राणायामही घडतो. फक्त व्याकरण नियमानुसार, वेदयुक्त, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र उच्चारले गेले, तर त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर जाणवायला लागतात. दिवसभर उत्साह जाणवतो, दुपारी आळस येत नाही. संस्कृत उच्चारणाची क्षमता जसजशी वाढत जाते तशी वाणी शुध्द होत जाते.

संस्कृत भाषा शिकल्यामुळे अन्य भाषा शिकायला खूप सोपे जाते. संस्कृत भाषा सर्व भारतीय भाषांची जननी आहे. हजारो वर्षांपूर्वीचा संस्कृत भाषेचा उगम आहे. संस्कृत भाषा ही कुणा एका व्यक्तीने निर्माण केली नसून, ग्रंथ, वेद, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, पुराण, उपपुराण, रामायण, महाभारत हे सगळे वाङ्मय संस्कृत भाषेत निर्माण झाले आहे.

रोज सकाळी विष्णूसहस्र नामाचा उपासनेचा ऑनलाइन नि:शुल्क क्लास घेतो. त्यामध्ये अनेक लोक जोडले गेले आहेत. त्यांना दररोज आवर्तन म्हणजे एका श्वासात मंत्र म्हणायला सांगितले जाते. हा एक प्रकारचा अनुलोम-विलोम प्राणायामाचा प्रकार जो मंत्रांच्या माध्यमातून केला जातो. कुठे दीर्घ श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा, हे मंत्रोच्चाराने कळायला लागते. सुरुवातीला मंत्र म्हणताना दम लागतो पण सवय झाल्यानंतर लोक एका दमात मंत्र म्हणायला लागतात. त्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते, हृदय सुदृढ राहते. काळजीपूर्वक मंत्र म्हटल्यावर लगेचच त्याचे परिणाम जाणवतात परंतु ते शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे गरजेचे असते. उच्चार बरोबर झाले की, त्याचा १०० टक्के फायदा होतो.

प्रा. अतुल तरटे, प्राचार्य, श्रीराम संस्कृत महाविद्यालय

संस्कृत दिनाची सुरुवात
१९६९ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्र आणि राज्य स्तरावर पहिला संस्कृत दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. कारण प्राचीन भारतातील अध्यापन सत्र याच दिवशी सुरू झाले होते. त्यामुळे संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ‘संस्कृत दिन’ म्हणून साजरी करण्यात येते

हेही वाचा :

The post संस्कृत दिन विशेष : पहिला संस्कृत दिन कधी साजरा झाला? काय आहे महत्व... appeared first on पुढारी.