नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील, असे सांगत देशात जातनिहाय जनगणना होईपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.
माजी पंतप्रधान स्व. व्ही. पी. सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सामाजिक न्यायाचा वारसा’ हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी भुजबळ यांच्यासह मान्यवरांनी देशाचे माजी पंतप्रधान आणि ओबीसींचा मसिहा स्व. व्ही. पी. सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी जेडीयू खा. गिरिधरी यादव, सीपीआयचे डी. राजा, डीएमके खासदार पी. विल्सन, ज्येष्ठ ओबीसी विचारवंत प्रा. कांचा इलाई, बीएसपी खा. कुनवर दानिश अली, जेएनयूच्या माजी कुलगुरू डॉ. शेफालिका शेखर, कार्यक्रमाचे आयोजक ट्रूथ सिकर्स इंटरनॅशनल या संस्थेचे सुनील सरदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी फुले पगडी देऊन छगन भुजबळ यांचा आयोजकांकडून सन्मान करण्यात आला.
भुजबळ म्हणाले की, व्ही. पी. सिंह जयंती साजरी करण्यासाठी आज इथे उभा राहिल्याचा अभिमान वाटतो. आज त्यांची जयंती असूनही त्यांचे योगदान लोकांना का आठवत नाही हा मोठा प्रश्न आहे. मागास समाजातील लोक त्यांना का विसरले, हा चर्चेचा विषय असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशाच्या पंतप्रधान पदावर स्व. व्ही. पी. सिंह यांनी केवळ ११ महिने कारभार केला. परंतु याच काळात त्यांनी हजारो वर्षांपासून मागासलेल्या लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. त्यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. त्यामुळे देशातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच ओबीसींना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊन त्यांनी देशाची आणि समाजाची दिशा कायमस्वरूपी बदलून टाकली आणि भारतातील लोकशाहीचा विस्तार वंचितांपर्यंत पोहोचवला, असेही ते म्हणाले.
जातीयवादाशी तडजोड नाही
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर जातीय समीकरणातून देश धुतला जाऊ लागला. त्यावेळी मंडल विरुद्ध कमंडल अशा यात्रा देशात निघाल्या. प्रसंगी केंद्रात पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार कोसळले. मात्र बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी त्याची परवा केली नाही. जातीयवादाशी त्यांनी तडजोड केली नाही. मात्र ज्या स्व. व्ही. पी. सिंह यांनी ओबीसी समाजासाठी मोठी किंमत मोजली त्या समाजाकडून तितका आदर मिळाला नाही. १० मार्च १९९० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचा निर्णयही व्ही. पी. सिंह यांनीच घेतला होता हे बहुतेकांना माहीत नसेल याची आठवण भुजबळांनी उपस्थितांना करून दिली.
हेही वाचा :
- अहमदनगर : जलजीवन कामांच्या गुणवत्तेची तपासणी ! जिल्हा परिषदेचे 14 विभागप्रमुख आज देणार अहवाल
- अहमदनगर एसटी महामंडळाची पंढरपूर वारी सुरू; तब्बल 400 बसचे नियोजन
- आजचे राशिभविष्य (दि.२६ जून २०२३)
The post ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना आवश्यक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.