नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिककरांभोवती संकटाची मालिका सुरूच असून, पाणीपट्टी दरवाढीच्या संकटातून सुटका होत नाही तोच पाणीकपातीचे संकट नाशिककरांसमोर उभे ठाकले आहे. नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यानंतर नाशिक महापालिकेने मागणी केलेल्या पाणी आरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट कपात करण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. यामुळे नाशिककरांना १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सुरूवातील आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा तर दररोज दोनवेळ पाणीपुरवठा होणाऱ्या भागात मार्चनंतर एकवेळच पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असून लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांनी सरासरी गाठली असली तरी मराठवाड्यातील जायकवाडीतील जलपातळी मात्र ४५ टक्क्यांपर्यंतच राहिल्याने मेंढीगिरी समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले. नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहातून ०.५० टीएमसी तर, दारणा धरण समुहातून २.६ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून जाताना उघड्या डोळ्याने बघण्याची नामुष्की नाशिककरांवर ओढावली.

पाणी आरक्षण जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी नाशिक शहरात तातडीने १५ टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पाणीपुरवठा विभागातर्फे बुधवारी (दि.२९) आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासमोर सादर केला जाणार असून, त्यानंतर पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.

नाशिकला केवळ ५३१४ दलघफू पाणीआरक्षण?

नाशिक महापालिकेने १५ आॉक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी शहरासाठी पिण्याच्या पाण्याकरीता गंगापूर धरण समुहातून ४४००, दारणेतून १०० तर मुकणेतून १६०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी नोंदविली होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रानुसार जलसंपदा विभागाने पिण्यासाठी गंगापूर धरण समुहातून ३८०७, दारणेतून १०० तर मुकणेतून १४०७ अशाप्रकारे एकूण ५३१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे नाशिकच्या पाणीआरक्षणात तब्बल ७८६ दशलक्ष घनफूट पाण्याची कपात करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिककरांवरच जलसंकट का?

गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी अर्थात ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात आला असताना या धरण समुहातून नाशिककरांच्या पाणीआरक्षण मागणीत तब्बल ५९३ दशलक्ष घनफूट कपात केली जाणार आहे. याचाच अर्थ विसर्गापेक्षाही अधिक कपात करण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातल्याचे कळते. वास्तविक नाशिक महापालिकेखेरीज एमआयडीसी, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र तसेच अन्य पाणीवापर संस्थांना देखील पाणीपुरवठा केला जातो. मग एकट्या नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षण मागणीतच कपात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रस्तावित पाणीकपात

पाणी कपात लक्षात घेता महापालिकेला उपलब्ध पाणीसाठा जुलै २०२४ पर्यंत पुरविण्याचे उद्दीष्टय लक्षात घेता शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार सुरूवातीला आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. त्यानंतर दोन वेळ पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागात मार्चनंतर दररोज एकवेळचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रस्तावित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती

धरण पाणीसाठी(दलघफू)

गंगापूर ४७३५

काश्यपी १८२८

गौतमी १७९७

दारणा ५८४७

मुकणे ६२२१

मनपाची मागणी व प्रत्यक्ष मिळणारे पाणी आरक्षण (दलघफू)

धरण मागणी प्रत्यक्ष मिळणारे पाणी आरक्षण
गंगापूर धरण समूह 4400 3807
मुकणे 1600 1400
दारणा 100 100
एकूण 6100 5314

The post नाशिककरांची संकटातून सुटका होईना, आता लवकरच १५ टक्के पाणीकपात appeared first on पुढारी.