नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र

महावितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त रोहित्र बदलासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त असलेल्या ७ हजार १३२ रोहित्रांपैकी ६ हजार ५१६ राेहित्र बदलले आहेत. हे रोहित्र अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये बदलण्यात आले. सध्या केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे बाकी असून, महावितरणकडे सद्यस्थितीत ४,०१८ रोहित्र अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलून द्यावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार महावितरणने राज्यभरात २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६,०९२ व त्यानंतर शनिवार (दि.१७)पर्यंत ६,५१६ असे एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहित्र युद्धपातळीवर बदलले आहेत.

कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते साडेतीन हजार रोहित्र दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलण्याचे ना. फडणवीस यांनी दिले. त्यानुसार मागील दोन दिवसांमध्ये राज्यात केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बाकी असून, ते तत्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नादुरुस्त किंवा जळालेल्या वितरण रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी महावितरणने राज्यात १९३४ कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११ हजार ६३२ रोहित्र दुरुस्तीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी साधावा संपर्क
नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑइलसह तब्बल ४०१८ रोहित्र सध्या अतिरिक्त उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील नादुरुस्त राेहित्राची माहिती संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अवघ्या १७ दिवसांत बदलले ६५१६ रोहित्र appeared first on पुढारी.