नाशिक : कश्यपी धरणात बुडून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

धरणात बुडून मृत्यू,www.pudhari.news

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कश्यपी धरणावर फिरत असताना पाय घसरून पडल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

जुने सिडकोतील खोडे मळा येथे राहणारे प्रशांत रामदास शेंडे (४९) हे महावितरणमधील कर्मचारी मित्रासमवेत शुक्रवारी (दि. 1) सकाळी ११ वाजता कश्यपी धरणावर गेले होते. त्यावेळी परिसरातील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ते धरणावर फिरायला गेले होते. त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. परिसरातील हॉटेलचालक शंकर पांगरे यांच्यासह पाच ते सहा जणांनी पाण्यात उडी मारून त्यांना पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेंडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या नाकात आणि तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेंडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. शेंडे हे महावितरण कंपनीच्या पंचवटी म्हसरूळ येथील कार्यालयात ऑपरेटर होते. ते महाराष्ट्र राज्य वीज अधिकारी व कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष होते.

हेही वाचा :

The post नाशिक : कश्यपी धरणात बुडून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.