नाशिक : वरुणराजाचा रुसवा कायम, जिल्ह्यातील धरणांमध्ये ६३ टक्के साठा

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निम्मा ऑगस्ट संपत आला तरीही जिल्ह्यावर वरुणराजाने अवकृपा केली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने धरणांमधील पाणीसाठा मर्यादित आहे. २१ प्रमुख धरणांंमध्ये सद्यस्थितीत ६३ टक्के साठा उपलब्ध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९० टक्के भरल्याने शहरवासीयांचा पाणीप्रश्न सुटला आहे.

चालू वर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव पाहायला मिळत आहे. ऑगस्टचे दोन आठवडे संपुष्टात आले असतानाही राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३९ टक्के पाऊस पडला आहे. कमी पावसाचा परिणाम खरिपाच्या पेरण्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यावरही झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये आजमितीस एकूण उपयुक्त साठा ४१ हजार ३७७ दलघफू इतका आहे. गतवर्षीशी तुलना केल्यास आजच्या घडीला धरणांमध्ये ५७ हजार ४८० दलघफू (८८ टक्के) साठा होता. म्हणजेच २०२२ च्या तुलनेत यंदा २७ टक्के पाण्याची तूट जाणवत आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा पाच हजार ५८ दलघफूवर पोहोचला आहे. तर समूहातील चारही प्रकल्प मिळून ७५५८ दलघफू म्हणजेच ७४ टक्के भरली आहे. इगतपुरीचा दारणा समूहात १६ हजार ४८० दलघफू पाणीसाठा असून, त्याचे प्रमाण ८७ टक्के आहे. याशिवाय पालखेड समूहामध्ये ४८२४ दलघफू (५८ टक्के), तर ओझरखेड समूहातील तीन प्रकल्प मिळून १३०० दलघफू (४१ टक्के) पाणी आहे. चणकापूर समूहात १० हजार ३१६ दलघफू साठा असून, त्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास येत्या काळात जिल्हावासीयांपुढे तीव्र पाणीसंकट उभे ठाकणार आहे.

असा आहे धरणसाठा (दलघफू)

गंगापूर ५०५८, दारणा ६६४६, काश्यपी ९८७, गाैतमी-गोदावरी १०२५, आळंदी ५५४, पालखेड ३१७, करंजवण २९२९, वाघाड १५७८, ओेझरखेड ७३१, पुणेगाव ५६९, भावली १४३४, मुकणे ५५२१, वालदेवी ११३३, कडवा १४८९, नांदूरमध्यमेश्वर २५७, भोजापूर २२७, चणकापूर १७५०, हरणबारी ११६६, केळझर ५७२, गिरणा ६८२८, पुनद ६७२.

-तब्बल सात धरणांमधून पाण्याचा विसर्ग

-तिसगाव, नागासाक्या, माणिकपुंज कोरडेठाक

-गतवर्षी धरणांमध्ये ८८ टक्के

The post नाशिक : वरुणराजाचा रुसवा कायम, जिल्ह्यातील धरणांमध्ये ६३ टक्के साठा appeared first on पुढारी.