विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश

कृषी पर्यटन pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळल्यानंतर वीकेंडसाठी शहरातील नागरिकांचे पाय ग्रामीण भागात वळायला लागले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात कृषी पर्यटन (Agro Tourism) व्यवसाय वाढण्यास सुरुवात झाली आहे. बळीराजालाही हा पूरक व्यवसाय अर्थार्जनासाठी वरदान ठरत आहे. विभागात एकूण ५६ केंद्रे विकसित झाली असून, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रे आहेत.

राज्य शासनाने ग्रामीण भागातील विकास आणि त्यातून राज्याचा विकास करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कृषी पर्यटन ही संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना शेती आणि शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायांची माहिती उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे आणि पर्यटकांना प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. (Agro Tourism)

पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Agro Tourism)
नाशिक शहरालगत असलेल्या बेळगाव ढगा, विल्होळी, चांदशी, जलालपूर, मखमलाबाद, रामशेज, ढकांबे, ओझर, देवळाली, आडगाव आदी ठिकाणी कृषी पर्यटनाला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे.

नोंदणी प्रक्रिया अशी
– अर्जदाराची जमिनीची ७/१२ कागदपत्रे
– आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, नोंदणी शुल्क
– अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ना हरकत प्रमाणपत्र
– ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक समिती स्थळाची पाहणी करेल. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.
– नोंदणी शुल्क : २ हजार ५०० रुपये, पाच वर्षांनी १ हजार रुपये नूतनीकरण

जिल्हानिहाय केंद्रे (Agro Tourism)
नाशिक – 35
अहमदनगर – 14
जळगाव – 3
धुळे – 3
एकूण – 56

The post विभागात ५६ केंद्रे : नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्रांचा समावेश appeared first on पुढारी.