विरोध नाक्यावर, भुजबळ बांधावर ; म्हणाले अश्रू पुसण्याची वेळ

छगन भुजबळ www.pudhari.news

येवला / निफाड : पुढारी वृत्तसेवा; वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’ योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मराठा आंदोलकांना हुलकावणी देत भुजबळांनी काल येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे जलदगतीने करण्यात यावेत, यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबत सुध्दा शासन स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले. ‘खचून जाऊ नका’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळीग्रस्त शेतीची पाहणी करत असतांना महिला शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी धीर धरा, खचून जाऊन नका सरकार आपल्या सोबत असून शासनाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास देत त्यांना धीर दिला.

या गावात निवड

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली.

राजकारणाची नाही, अश्रू पुसण्याची वेळ : मंत्री छगन भुजबळ

अवकाळीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतांना ही राजकारण करण करण्याची नाही तर त्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे. सर्वच पक्षांनी राजकारण न करता एकत्र येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची व्यथा आपण समजून घेतली. ज्यांनी विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. त्यामधील काही लोक हे त्या गावातील देखील नव्हते. त्यामुळे त्यांचा होणारा विरोध हा राजकीय असून मतदारसंघातील जनता आपल्या सोबत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या यावेळी कुणीही राजकारण करू नये हीच अपेक्षा. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

हेही वाचा :

The post विरोध नाक्यावर, भुजबळ बांधावर ; म्हणाले अश्रू पुसण्याची वेळ appeared first on पुढारी.