पेन्शनच्या रकमेसाठी मुलानेच केला ९० वर्षीय आईचा खून

Murder

जळगाव पुढारी वृत्तसेवा- जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दि. ११ मे रोजी एका ९० वर्ष वृद्ध महिलेचा राहत्या घरात मारहाण करून खून झाला होता. हा खून दगिण्यांसाठी झाला असावा असा प्राथमिक अंदाज होता. पाच दिवसानंतर संशयिताला पकडण्यात यश आले आहे.

का केला खून ?

  • आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले आहे.
  • मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
  • आईच्या पेन्शनवर मुलाचा डोळा होता.

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०, रा. वाकडी ता. जामनेर) गावात एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हे परिवारासह राहत आहे. त्यांच्या दोन मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून त्या ११ ते सव्वा ११ वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला होता. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला होता.

पाच दिवसांनी पोलिसांना यश

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशन व एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले होते. सुगावा लागत नव्हता. अखेर पाच दिवसानंतर पोलिसांना यश आले.  त्यांनी मयत राधाबाई यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी (वय ६५, रा. वाकडी ता. जामनेर) यालाच अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

मयत राधाबाई यांचे पती भालचंद्र परदेशी हे शिक्षक होते. पती भालचंद्र परदेशी हे वारल्यानंतर ती पेन्शन राधाबाई यांना सुरू होती. दरवेळेला एकत्र तीन महिन्याची पेन्शन घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा.

पेन्शनच्या रकमेमधून चार पाच हजार रुपये आई राधाबाई हिला देऊन बाकीचे सुभाष हाच ठेवून घ्यायचा. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला व सुभाषला सोबत येण्यास नकार दिला होता. यामुळे सुभाषला आईच्या वागण्याचा राग आला होता. या वागण्यातून शनिवारी त्याने आईसोबत वाद घातला आणि आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला.

हेही वाचा –