आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

मंत्री अनिल पाटील,www.pudhari.nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अंतिम अहवाल आठवडाभरात शासनास सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. (Nashik Heavy Rain)

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.२८) मंत्री पाटील यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित हाेते. (Nashik Heavy Rain)

मंत्री पाटील म्हणाले, शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही शासनाकडून जलदगतीने करता येणे शक्य होणार आहे. पंचनाम्यावेळी कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. अंतिम अहवाल प्राप्तीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतपीकांचे पंचनामे केले जात आहेत. यात कोणी बाधित शेतकरी राहिल्यास त्यांनी स्वत: संपर्कात येत पंचनामा करून घ्यावा, असे त्यांनी केले. अवकाळी पावसामुळे निफाड व बागलाण तालुक्यांत प्रत्येकी एक व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यात 15 मोठी जनावरे तर 50 लहान जनावरे दगावली आहेत. 206 घरांचे अंशत: तर 31 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहेत, अशी माहिती राजेंद्र वाघ यांनी यावेळी दिली. विवेक सोनवणे यांनी इगतपुरीत भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच नुकसानीची विमा भरपाईची मागणीचे अर्ज 72 तासात ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

६६ मंडळात २५ मिमीपेक्षा जास्त पाऊस

जिल्ह्यात रविवारी 152 महसूल मंडळापैकी 66 मंडळात 25 मिमीपेक्षा जास्त तर नांदगावमधील वेहेळगाव मंडळात 66 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्राथमिक नजर अंदाजानुसार द्राक्षपीकांचे 11 हजार 652 हेक्टर, कांदा पीकाचे 10 हजार 673 हेक्टर, डाळींब व इतर पिकांचे मिळून 34 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 924 गावे बाधित झाले असून 70 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील appeared first on पुढारी.