नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण नाशिककरांना हात जोडुन विनंती आहे, भविष्यात चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कांदा दराबाबत ठोस निर्णयाशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. शहरातील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
मंत्री पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर ऊभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी शासन सहकारी संस्थांना अनुदानही देते. पण बहुतेकदा चुकीच्या व्यक्तींच्या हाती संस्थेचा कारभार गेल्याने तीचे नुकसान होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एनडीसीसीच्या बाबतीत आपण नेहमीच एैकत आला आहे. नागरीकांना वाटते की बॅंकेत काम करणारे संचालक हे पुढार्यांशी संबधित असतात. ही राजकारण्यांची पिल्लावळ आहे, अशी भावना झाली आहे. प्रत्यक्षात मात्र, तसे नाही. एनडीसीसी वाचविण्यासाठी शासन म्हणून आपण प्रयत्न करतो आहे. मंत्रीमंडळ बैठकीतही त्यावर चर्चा सुरू आहे. या प्रयत्नांना यश आल्यास चांगले आहे. परंतू, बँक पूर्वपदावर आल्यास चुकीच्या व्यक्तींना पुन्हा तेथे पाठवू नका. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती उद्भवेल, अशी उद्विगता पवार यांनी बोलून दाखविली.
अजित पवार यांनी कांदा प्रश्नावर बोलतांना दर अद्यापही घसरलेले असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. दराबाबत नाशिकचे लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात आहे. याबाबत केंद्र सरकारकडे वेळ मागितली असल्याचे सांगत या प्रश्नी योग्य तो ताेडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनीि दिला.
नाशिकचे प्रश्न सोडविणार
प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकने साहित्य, कला, क्रिडा व शैक्षणिक क्षेत्राची परंपरा जतन केली आहे. मुंबई-पुण्याला प्रदुषणाचा विळखा पडला असताना नाशिकचे हवामान उत्तम असल्याची पावती अजित पवार यांनी दिली. नाशिककरांनी नेहमीच आमच्यावर प्रेम केले असल्याचे सांगताना नाशिकच्या विकासासाठी तसेच येथील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द आहे, अशी ग्वाही पवारांनी दिली.
रेल्वे, रस्त्यांबाबत निर्णय
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरणासह येथील अनेक प्रकल्पां बाबत चांगले निर्णंय शासनाने घेतले आहे. सप्तश्रृंग गडाच्या विकासासाठी ८२ कोटींची निधी देताना यापुढेही आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. दरम्यान, अवयवदान चळवळीला प्राेत्साहन देतानाच त्यापुढील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. याबाबत प्रश्न सादर करण्याची सूचना करतानाच या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ व त्या विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
असे आहेत पुरस्कारार्थी
कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, अभिनेते अक्षया जोशी, हार्दीक जोशी व गौरव चोपडा, रामचंद्रबापू पाटील, डॉ. भाऊसाहेब मोरे, शैफाली भुजबळ, संगीता बोरस्ते, दत्ता पाटील, चंद्रशेखर सिंग, गौरी घाटाेळ आदींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हेही वाचा :
- कळस परिसरामधील समस्या सोडविणार : सहायक आयुक्त विजय नाईकल
- सुरक्षा समितीचा ‘ओल्ड क्लब’
- ICC World Test Championship : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप; टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप
The post नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका appeared first on पुढारी.