नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

गुलाबी थंडीची चाहूल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यानंतर अवघ्या जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर व परिसर पहाटेच्या वेळी धुक्यात हरवून गेले. थंडीचा जोर वाढल्याने सामान्यांना हुडहूडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. (Nashik Cold)

अरबी समुद्रामधील कमीदाबाच्या पट्यामुळे रविवारी (दि.२६) जिल्ह्यात अवकाळीच्या जोरदार सरीं सोबत गारपिटीदेखील झाली. अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या पावसानंतर थंडीमध्ये कमालीची वाढ झाली. नाशिक शहर व परिसरामध्ये रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक आहे. त्यामुळे शहरवासीय गारठून गेले आहेत. त्यातच मंगळवारी (दि.२८) पहाटे अवघ्या शहरावर धुक्याची चादर पांघरली गेली. त्यामुळे दृश्यमानता कमी होऊन रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. तसेच थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी होत असून ऊबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. शहरात किमान तापमान १९ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. (Nashik Cold)

ग्रामीण भागालाही थंडीची चाहूल लागली आहे. अगोदरच गारपिटीने द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत पहाटेच्यावेळी पडणाऱ्या दवबिंदुमुळे उरल्यासुरल्या द्राक्षबागांनाही धोका संभावतो आहे. सदर वातावरणाचा द्राक्षमण्यांच्या फुलोऱ्यावर तसेच फळामध्ये साखर ऊतरण्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. निफाड, दिंडोरी, चांदवड आदी भागात बागा वाचविण्यासाठी शेकोट्या पेटवून धुरफवारणी केली जातेय. दरम्यान, ऊर्वरित जिल्ह्यातही पाऱ्यात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी विविध ऊपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.