नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्याचा फायदा धरणांना होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात तीन टक्क्यांची वाढ होऊन तो २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मान्सूनने जिल्ह्यात यंदा उशिरा आगमन केले. लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले असताना, २९ जूनपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. सर्वदूर हजेरी लावणाऱ्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्यास मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये दि. १ जुलै रोजी १४ हजार ७६९ दलघफू म्हणजेच २२ टक्के साठा होता. सततच्या पावसाने या साठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली असून, रविवारी (दि. २) तो १६ हजार २४७ दलघफूवर पोहोचला.
इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार कायम असल्याने दारणा समूहातील प्रकल्पांमध्ये वेगाने पाण्याची आवक होत आहे. दारणा धरणात रविवारी (दि. २) १८९९ दलघफू म्हणजे २७ टक्के साठा निर्माण झाला असून, शनिवारी (दि. १) त्यात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. भावलीचा साठा १८ टक्क्यांवरून २६ तसेच मुकणेचा साठा ४० वरून ४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूरमध्ये अवघा एक टक्का पाणीसाठा वाढला असून, सध्या प्रकल्पात ३० टक्के म्हणजे १६९९ दलघफू पाणी आहे. याशिवाय चणकापूरच्या साठ्यात २४ तासांत ७ टक्क्यांनी भर पडत तो ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्य धरणांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैच्या मध्यातच धरणे काठोकाठ भरू शकतात.
२४ तासांतील टक्केवारी
धरण -१ जुलै-२ जुलै
गंगापूर- २९- ३०
गौतमी -७ – १०
दारणा- १६- २७
भावली -१८- २६
मुकणे -४० -४३
चणकापूर-२८- ३५
हेही वाचा :
- नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा
- नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा
- Drone flying on PM House: पंतप्रधानांच्या निवासस्थानावर दिसले संशयास्पद ड्रोन; पोलिसांकडून तपास सुरू
The post नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.