निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

शरद पवार यांच्या दौर्‍यात लोकसभा उमेदवार ठरणार

निफाड: पुढारी वृत्तसेवा
मोदींची काय गॅरंटी आहे. त्यांनी एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची सुरुवात करतोय, तुम्ही साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाशिकच्या निफाड येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात पवार म्हणाले की, निवडणूक दोन-तीन दिवसांत जाहीर होणार आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. देशात जे चालू आहे जे घडतंय हे लोकांच्या हिताचे नाही. अनेक नेते, राज्यकर्ते बघितले, वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती. मात्र लोकशाही टिकली याचा अभिमान देशाला तर आहेच पण जगालाही आहे. ईडीच्या माधयमातून काय चालले आहे, हे सारा देश पाहत आहे, असा जोरदार प्रहार केला.

एका आठवड्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ
नरेंद्र मोदी यांनी काय धोरणे आखली? शेतकऱ्यांसाठी काय केले. मनमोहन सिंग यांच्या काळात शेतीचे काम आले. धान्य आयात करण्याची मागणी झाली. धान्य आयात केल्याने मी व्यथित झालो. स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली, आम्ही त्या कुटूंबाची भेट घेतली. काय झाले विचारलं तर मुलीचे लग्न ठरले, सावकाराचे कर्ज घेतले होते त्याने तगादा लावला. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही एक आठवड्यात शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देश परदेशातील धान्य आयातीची वेळ आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या तर देशात आयातीचा सिलसिला सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी मोदींच्या कृषी धोरणांवर टीका केली.

देशाच्या संविधानाची चिंता
मोदीं सध्या मोठमोठ्या गॅरंटी देत आहेत. परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न अजिबात वाढले नाही. एकही गॅरंटी पूर्ण नाही, फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रात राऊत यांनी सरकार विरोधात लेखन करताना त्यांना तुरुंगात धाडले. देशमुखांना टाकले, केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले. आता देश वाचवायला हवा. देशाच्या संविधानाची चिंता आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका त्यांनी मोदीं तसेच शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.

शरद पवारांचे आवाहन
सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि इतर पक्ष एकत्र आलो आहोत. देशाला पर्याय देऊ असे सांगितले आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून करत आहोत. इथला शेतकरी कष्टकरी आहे. तुमच्या पासून लढण्याची सुरुवात करत आहेत, तुम्ही साथ द्या, असे आवाहन शरद पवारांनी यावेळी शेतकऱ्यांना करताच उपस्थित शेतकऱ्यांनी पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

The post निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका appeared first on पुढारी.