मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला

मराठा समाज आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवामराठा आरकी मुंबईत लढा देणार असल्याची मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत कूच करण्याच्या दिशेने नियोजन करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने वारकरी दिंडी काढणार असून, यासाठी खेड्यापाड्यातील समाजबांधवांना जोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर १०५ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची मंगळवारी (दि.२६) सांगता करण्यात आली. (Maratha Reservation)

उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळपाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महापालिकेचे माजी सभागृहनेता दिनकर पाटील, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, ॲड. कैलास खांडबहाले आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी नाना बच्छाव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषण सोडले. याप्रसंगी नितीन रोटे-पाटील, राम खुर्दळ, नीलेश ठुबे, विकी गायधनी, सागर वाबळे, संजय फडोल, संदीप हांडगे, रोहिणी उखाडे, ममता शिंदे-पाटील, एकता खैरे, पूजा धुमाळ, प्रफुल्ल वाघ, योगेश नाटकर आदी उपस्थित होते.

शनिवारी नियोजन बैठक

जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार नाशिकमधूनदेखील मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत पोहोचणार आहेत. याबाबतच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाने येत्या शनिवारी (दि.३०) बैठकीचे आयोजन केले आहे.

हेही वाचा :

The post मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला appeared first on पुढारी.