शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

शिवसेना www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.

धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले असून इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतीवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीमुळे हिरावला आहे. कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाएवढे देखील उत्पादन निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी मेटाकुटीला आला असून त्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई देणे अत्यावश्यक झाले असल्याचे निवेदनाव्दारे नमुद करण्यात आले आहे.

सरसकट पंचनामे करावे

अतिवृष्टीच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात. याकरिता पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना सहसंपर्क गुलाबराव वाघ व शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, जितू धनगर, ॲड. शरद माळी, उपतालुक प्रमुख राजेंद्र ठाकरे, माजी जि. प. सदस्य जानकीराम पाटील, दीपक सोनवणे, नाना ठाकरे आदी शिवसैनिक पदाधिकारीसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना appeared first on पुढारी.