नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

भूस्खलनाचा धाेका,www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी

ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटूंब स्थलांतरीत करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, कळवण व पेठ या चार तालुक्यांना भुस्खलानाचा सर्वाधिक धोका आहे.

ईशाळवाडीतील ग्रामस्थांसाठी गुरूवारची (दि.२०) पहाट काळ बनून आली. भुस्खलनामुळे अवघे गाव धरतीच्या पोटात सामावले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तेथील गावात मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. या घटनेची गंभीरता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांचा आढावा घेतला. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी व कळवण या चार तालुक्यांमधील ४३ गावे व पाड्यांना भुस्खलनाचा सर्वाधिक धोका आहे. एकट्या कळवण तालुक्यातील ३० ठिकाणांचा त्यात समावेश आहे. याशिवाय त्र्यंबके‌श्वर, इगतपूरी व सुरगाणा या तालुक्यांनाही लॅण्डस्केपचा धाेका संभावतो.

भुस्खलनाचा धोका संभावता जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना भुस्खलनाचे ठिकाणे अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाचा जोर वाढल्यास संबंधित ठिकाणच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करावे. अशा नागरिकांसाठी शेल्टर अथवा तात्पूरत्या निवारागृहासाठी सामाजिक सभागृहे, मंदिरे, शाळा आदी ठिकाणे राखीव ठेवावी. या ठिकाणी नागरीकांना जेवण, पाणी व अन्य सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासानाने तहसीलदारांना दिल्या आहेत.

जनजागृतीवर भर

जिल्हा प्रशासनाने मे मध्ये सर्व तालुक्यांचा मान्सून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला. हा आराखडा तयार करताना लॅन्डस्केप होणाऱ्या भागांमधील नागरिकांमध्ये स्थानिक प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात आली. दरम्यान, भुस्खलनाचा धोका लक्षात घेत गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सुरगाण्यात काही गावांचे स्थलांतरण प्रशासनाने केले होते.

तुर्तास स्थलांतरण नाही

जिल्ह्यात जुलैचा तिसरा आठवडा संपुष्टात आला असताना अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे तूर्तास भुस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आलेले नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास तातडीने पाऊले ऊचलले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यात ५११२ घटना

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अहवालानुसार २००० ते २०१२ याकाळात महाराष्ट्रात ५ हजार ११२ भूस्खलनाच्या घटना घडल्या. इस्त्रोच्या लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया या अहवालामधून ही माहिती उजेडात आली. या अहवालात देशातील भूस्खलनप्रवण १४७ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करताना त्यांना अलर्ट जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या यादीत नाशिक १२८ व्या क्रमांकावर आहे.

भूस्खलन का होेते?

राज्यातील नाशिकसोबत ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे भूस्खलनप्रवण क्षेत्रात येतात. भूस्खलन ही नैसर्गिक घटना आहे. अति पाऊस, पूरपरिस्थिती, उत्खनन, डाेंगरउतार कापणे, भूकंप, बर्फ वितळणे, खोदकाम व मोठ्या प्रमाणात विकासकामे ही भूस्खलनाची कारणे आहेत.

भूस्खलनप्रवण भाग

नाशिक : काझीगढी.

पेठ : सदडपाडा, बिलक्स, बेहेडपाडा, गोडसपाडा, देवरपाडा, कासारविहीर, जांबळे.

दिंडोरी : रडतोंडी, अवंतवाडी, चंडिकापूर, सूर्यगड, पिंपराज.

कळवण : मंगळदार, तातीणपाडा, जमाळे, कोसुर्डे, भावकुर्डे, कार्भेळ, देसगाव, गांडूळमोकपाडा, तिरळ, आमदार, दिंगामे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चिंचोळमाळ, हनुमंतमळा, महाल, पायरपाडा, कठारे दिगर, बिऱ्हडवात, दरेगाव, वणी, मोहनदरी, नांदूर, सप्तश्रृंगगड, महेदर, मुकणे वणी, वडाळे, पिंपरी मरकड, कटाळगाव, पाळेपिंपरी, माची धोडप

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश appeared first on पुढारी.