पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद

नाशिक : गणेश सोनवणे

पाण्याच्या चिंतेत रातरातभर झोप लागत नाही. दुसरं कामही आम्हाला सुचत नाही. कारण, आमचा अख्खा दिवस पाण्याच्या शोधातच जातो. त्यातही पाणी भेटलं, तर ठीक. नाही तर रिकामे हंडे तसेच घेऊन परतावं लागतं. ही व्यथा आहे, मुळेगाव येथील ग्रामस्थांची. येथील गावातल्या सगळ्या विहिरीही आटल्याने प्रशासनाने गावाबरोबरच सहाही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त साद येथील महिलांनी प्रशासनाला घातली आहे.

मुळेगाव हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा वाड्यांचे गाव आहे. येथे आदिवासी समाजबहुल आहे. मोठी पिंपळवाडी, छोटी पिंपळवाडी, पोंगटवाडी, भोकरवाडी व मिळणवाडी अशा या सहा वाड्या आहेत. मुळेगावासह या सहाही वाड्यांत जवळपास पाच हजार लोकवस्ती आहे. मात्र, या सगळ्यांनाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पोंगटवाडीचे काशीनाथ रावजी शिद सांगतात, पावसाळ्यात येथे धो-धो पाऊस पडतो. पण, उरलेले आठ महिने शिवार कोरडाठाक असतो. उन्हाळ्यात तर एकेका थेंबासाठी वणवण होत आहे. एकट्या पोंगटवाडीत सुमारे 450 लोक राहतात. त्यांच्यासाठी विहीर आहे, पण तीही आटल्याने दीड-दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामवाडीला पायपीट करत जाऊन पाणी आणावे लागते. यात या महिला आणि बालकांचा सगळा दिवस पाण्याभोवतीच फिरतो.

पोंगटवाडी pudhari.news
नाशिक : दोन किलोमीटरवरुन पिण्यासाठी आणलेले गाळयुक्त पाणी.

पहाटेपासून पाणी हुडकण्याची लगबग सुरू होते. दुपारी घरातली कामं करून थोडी विश्रांती घेतली की, पुन्हा दुपारी 3 नंतर पाण्याचा शोध सुरू होतो. 70 वर्षांच्या मंगूबाई नवसू बुरबुडे थरथरत्या हातात हंडा घेऊन सांगतात, वय झाल्याने डोक्यावर दोन दोन हंडे तोलवत नाही. म्हणून मी आता पाणी आणायला जात नाही. सूनबाई जाते. गावातल्या सूनबाई विमल मस्के हताश होऊन गावातल्या विहिरी, नद्या, नाले आटून गेल्याने गायी म्हशीसुद्धा पिणार नाही असं पाणी प्यावं लागत असल्याचं दु;ख व्यक्त करतात. गाळ असलेलं पाणी प्यावं लागतं. हे झालं पिण्याचं, इथून चार किलोमीटरवर दये गावच्या धरणावर कपडे धुवायला जावं लागतं. रोज जाणं शक्य नाही म्हणून आठ दिवसांतून जातो. दोन-तीन किलोमीटर पायपीट करून वाटी वाटी पाणी उपसून किती पाणी हाती लागणार? दोन- तीन हंडे – त्यात आम्ही प्यायचं, जनावरांना पाजायचं, कपडे धुवायचे की, अंघोळ करायची सांगा ना, काय काय करायचं? पाण्यावरून कधी कधी वादही होतात. ज्यांच्या मालकीची विहीर आहे, तेही कधी-कधी हटकवतात. अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.

पाणीप्रश्न इथल्या वाड्या-वस्त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. 1943 चा जन्म असलेल्या बच्चीबाई रावजी शिद डोळ्यात प्राण गोळा करून गावची परिस्थिती सांगतात, पैनागाव माझं माहेर, पोंगटवाडीत सासरी आले, तेव्हा तरणी होते. आता तर म्हातारी झाले, तेव्हापासून हे सारं असंच पाहात आले. तेव्हाही तेच आणि आताही…

पाण्याची व्यथा सांगताना पोंगटवाडीतील महिला

सरकारी योजना जमिनीत गडप
इथे सरकारी योजना येतात आणि जमिनीत गडप होतात. सरकारची एकही योजना या लोकांची तहान भागवू शकलेली नाही. जलजीवन मिशनही येथे कुचकामी ठरले आहे. पाइपलाइनचे काम अर्धवट आहे. येथून चार किलोमीटरवर दये गावचा बंधारा आहे. पण पाइपलाइन नसल्याने गैरसोय असल्याची खंत पोंगटवाडीचे राजू शिद यांनी व्यक्त केली. सध्या टॅंकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गावात पिण्याचा टँकर उपलब्ध करून द्या अशी आर्त साद यावेळी पोंगटवाडीतील महिला व लहानग्या लेकरांनी प्रशासनाला घातली.

हेही वाचा:

The post पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्या; मुळेगावच्या महिलांची आर्त साद appeared first on पुढारी.