आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिल्ली येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या वरद नेरकर याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. या घटनेने विद्यार्थ्यांचा ताणतणाव हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशभरात दररोज १५ हून अधिक विद्यार्थी ताणतणावातून आत्महत्या (suicide) करीत असल्याचा निष्कर्ष आहे. त्यामुळे ताणतणावर मार्ग शोधणे आवश्यक असून आत्महत्या हा पर्याय नाही नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी अनेक जण शिक्षण घेत असतात. मात्र शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना मानसिक, शारिरीक, आर्थिक, सामाजिक अडचणी येत असतात. त्यावर मार्ग काढल्यास शिक्षणातील अडथळे दुर होतात. तर अनेकदा काही पर्याय दिसत नसल्याने विद्यार्थी टोकाचे निर्णय घेतानाही दिसतात. नुकतीच शहरातील एका शाळेत विद्यार्थिनीकडे ई सिगारेट आढळल्याने तिने शाळेच्या इमारतीवरून उडी मारल्याची घटना घडली. तसेच याआधीही शहरासह जिल्ह्यातील १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये निकालाची भिती, अभ्यास न झाल्याने, निकालानंतर घरचे-शिक्षक ओरडतील ही भिती वाटत असल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या (suicide) केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

आत्महत्यांची कारणे असे..
– अभ्यासात यश नाही मिळाले तर मित्रपरिवार, नातेवाईक काय बोलतील?
– करीअर कसे होणार, भविष्याची चिंता
– शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांकडे पैसे नसणे
– चुकीचे मित्रसंगती, व्यसनांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे. कालांतराने चुक उमगल्यास आत्महत्येचा विचार करणे
– पालक, शिक्षक, मित्रांकडून अपेक्षीत मदत, मार्गदर्शन, पाठबळ न मिळाल्याने

विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबद्दलची अकारण भिती असते. तसेच काही प्रमाणात शिक्षण व्यवस्थाही कारणीभूत असून विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. दडपणामुळे आपण स्वत:सह पालकांची अपेक्षा पुर्ती करू शकत नाही, असे वाटते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतात. हताश होऊन विचार करण्याची क्षमता थांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचा विचार येतो. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा दबाव टाकू नये. त्यांची क्षमता ओळखा. घरात खेळते वातावरण तयार करा. मुलांसोबत बोलते राहा. मुलं त्यांच्यावरील ताणतणावबाबत मोकळेपणाने बोलू शकतील असे घरातील वातावरण पाहिजे. मुलांच्या समस्या, अभ्यासाच्या भितीवर पर्याय शोधा. अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांची आवड, गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. – डॉ. प्रा. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ज्ञ.

The post आत्महत्या हा पर्याय नाही तज्ज्ञांचे मत appeared first on पुढारी.